• मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

औरंगाबाद, दि. 27 (जिमाका) :   संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याला थोर अशी संत परंपरा लाभलेली आहे. संतांच्या ओव्या, अभंग, ग्रंथांच्या माध्यमातून मराठी अजरामर झाली. या मराठीची समृद्धी वाढविण्यासाठी मराठीचे संस्कार, संस्कृती जतन करण्यासाठी मराठी भाषेचा प्रत्येकाने आग्रह धरून मराठीचा वापर वाढविला पाहिजे. या आग्रहाची सुरूवात स्वत:पासून करावी, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.

शासकीय विभागीय ग्रंथालयामध्ये शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. रामदासी बोलत होते.  या कार्यक्रमास मनपा उपायुक्त कमलाकर फड, मानव विकास मिशनचे उपायुक्त धूपचंद राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहायक संचालक सुनील हुसे, विभागीय ग्रंथपाल सुभाष मुंढे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब वैद्य आदी उपस्थित होते.

श्री. रामदासी म्हणाले, पूर्वी संत परंपरेतून आलेल्या ओव्या, अभंग ऐकायला मिळत. आता तशी परिस्थिती क्वचित पहावयास मिळते. आपली मराठी श्रेष्ठ, समृद्ध अशी भाषा आहे. दासबोधांपासून मुकुंदराजांपर्यंत, संत तुकारामांपासून चक्रधरांपर्यंतच्या साहित्यात शब्दांची वैविध्यता, भाषेचे लालित्य समजण्यास मदत होते. पंजाबमध्ये संत नामदेवाच्या अभंग, ओव्यांना सहज स्वीकारले. इंग्रजीनेही मराठीतून अनेक शब्द घेतलेले आहेत. तसेच मराठीनेही अन्य भाषेतील शब्द संपदेबाबत सर्व समावेशक पद्धतीने विचार करून अधिक समृद्ध होणे आवश्यक असल्याचे मत श्री. रामदासी यांनी मांडले.

मराठी भाषेला उत्तम व्यासपीठ दिल्लीमध्ये आहे. तेथील महाराष्ट्र परिचय केंद्र मोठ्याप्रमाणात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करत असते. त्यांच्या ग्रंथालयातून मराठीला अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघ लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांच्या व्यक्तीमत्त्व चाचण्यांची तयारीही महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत करण्यात येते. त्याच धर्तीवर जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र आणि ग्रंथालय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विविध नवोपक्रम राबविण्यात यावे. जिल्ह्यातील विविध ग्रंथालयात मिळणारी ग्रंथांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल, या दृष्टीने विचार व्हावा, अशी अपेक्षा श्री.रामदासी यांनी ग्रंथालयाकडून व्यक्त केली.

मराठी भाषेचा गौरव करताना दैनंदिन वापरात प्रत्येकाने कटाक्षाने मराठीचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मांडले. वर्षभर आपण अनेक दिन साजरे करत असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा असा मराठी भाषा गौरव दिन आहे. या ‍दिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने दैनंदिन कामकाजात मराठीलाच प्राधान्य द्यावे. मराठी भाषेच्या दैनंदिन वापराबरोबरच ती आचरणात देखील आणावी, असे श्री. राठोड म्हणाले.

श्री.फड यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व विषद करताना आठवीपासून पदवी शिक्षणापर्यंत महत्त्वाचे साहित्य शासकीय ग्रंथालयात वाचले. या वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोग झाला, असल्याचे सांगितले. शासनाने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहेच. परंतु सर्व शाळांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये मराठी भाषेच्या एखाद्या पाठाचे वाचनदेखील होणे अपेक्षित असल्याचे श्री. फड म्हणाले. त्यातून आगामी काळात मराठी अधिकाधिक समृद्ध होईल, असे मत मांडले.

श्री. हुसे यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व सांगितले. जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन, वाचक चळवळीला विविध उपक्रमांतून पुढे नेण्याचा प्रयत्न होत असतो. वाचनाची आवड निर्माण झाल्यास त्यातून समृद्ध वाचक घडत असतो. आजच्या काळात इंग्रजी शब्दांचा वापर अधिकाधिक वाढत चाललेला आहे. तो टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरावा. दररोज किमान इंग्रजी वापरातील शब्द टाळून मराठी शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करावा, असे आवाहनही श्री. हुसे यांनी करताना मराठी भाषा दैनंदिन जीवनात अंगीकारून कृतीशील बनण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात श्री. वैद्य यांनी संतांनी मराठी भाषेला सर्वगुणसंपन्न केले. आज साहित्य संमेलने, कवी संमेलने आयोजित करण्यात येतात. यामध्ये मराठी भाषा अग्रस्थानी आहे. मराठी भाषा ज्ञानाची भाषा आहे. इंग्रजी विज्ञानाची भाषा आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर प्रत्येकाने करायलाच हवा. संत बहिणाबाई चौधरी, वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेत साहित्याची रचना केली. मराठीला सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले.

इतर भाषक ज्याप्रमाणे त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगतात, त्याचप्रकारे मराठी भाषकांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे, आजच्या काळाची गरज असल्याचे श्री. वैद्य म्हणाले. मराठी भाषेतील चांगले स्वीकारून तिला अधिक सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी मराठी भाषेचा आग्रह हा तर प्रत्येकाने धरायलाच हवा, असेही श्री. वैद्य यांनी सांगितले.

मराठी भाषेतील वर्णमाला ‘अ’ पासून सुरू होऊन ‘ज्ञ’ पर्यंत आहे. याचाच अर्थ असा, की मराठी भाषा अज्ञानापासून सुरू होते व ज्ञान देऊन थांबते, ही मराठीची थोरवी आहे, असे मनोगत ग्रंथालयातील वाचक महेश जाधव याने व्यक्त केले. राजेश राठोड यांनीही मराठी भाषेचा गौरव करताना विचार मांडले.

प्रास्ताविकात श्री. मुंढे यांनी मराठी भाषा गौरव दिनाची भूमिका विषद केली. प्रत्येकाने मराठीत बोलावे, ऐकावे, वाचावे, पहावे असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात, याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

सुरूवातीला मान्यवरांच्याहस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी वि.वा.‍ शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांना ग्रंथ, पुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री.मुंढे यांनी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा दिली. सूत्रसंचालन मयूर तावडे यांनी केले. श्री. मुंढे यांनी आभार मानले.

******