औरंगाबाद,दि. 07 (जिमाका) –  मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची टंचाई असते.  मराठवाड्यातील पाण्याची आवश्यकता पाहता अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पा‍टबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी मंडळाचे कार्यकारी संचालक ना. व. शिंदे, जलसंपदाचे मुख्य अभियंता ए.पी.आव्हाड, लाभक्षेत्रविकासचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक डी.डी. तवार, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता के.बी.कुलकर्णी आदींसह प्रकल्पांचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

खोरेनिहाय महाराष्ट्रातील सिंचन क्षमता, गोदावरी, कृष्णा, तापी, कोकण, नर्मदा नदी खोऱ्यातील उपलब्ध पाणी आणि तूट, महामंडळांतर्गत निर्मित पाणीसाठा, सिंचन क्षमता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजिवनी योजना, नदीजोड प्रकल्प व प्रवाही वळण योजना, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प, लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प, बीड जिल्ह्यातील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प टप्पा 2, पैठण येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) आदींसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाचा सविस्तर आढावा श्री.पाटील यांनी घेतला. तसेच यावेळी योग्य त्या सूचना केल्या व अपूर्ण प्रकल्पे पूर्ण करावेत, असे सांगितले.

सुरूवातीला मंत्री श्री. पाटील यांचे श्री.‍ शिंदे यांनी स्वागत केले. तसेच महामंडळाच्या कामकाजाचे  सविस्तर सादरीकरण केले. बैठकीनंतर श्री. तवार यांनी आभार मानले.

********